ऑपरेशन सिंदूर
“बिनय न मानत जलधी जड,गए तीन दिन बीत
बोले राम सकोप तब, भय बीन होय न प्रीत |
रामचरितमानस मधील हा दोहा किती सार्थ आहे! भारताने ६ आणि ७ मे २०२५ च्या रात्री सुरु केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील दोह्याचा परिपाक आहे. भय अर्थात अनुशासन निर्माण झाले तरच पाकिस्तानसारखा देश वठणीवर येईल. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेला अमानुष आणि भ्याड हल्ला, त्यानंतर राजकीय,आर्थिक बाजूंनी पाकिस्तानची झालेली कोंडी आणि सरतेशेवटी ७ मे ते १० मे या ७२ तासांत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने उडवलेला पाकिस्तानचा धुव्वा!! हे सारे काही एखाद्या हॉलीवूड चित्रपटापेक्षाही रोमांचक आहे.या युद्धाची पार्श्वभूमी,युद्धाचे स्वरूप व परिणाम आणि युद्धविरामाची कारणे ह्या सा-या बाबींवर प्रकाशझोत टाकणारे,त्यामागील तथ्य समोर आणणारे व्याख्यान दि सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी तर्फे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.व्याख्याते होते- अर्थतज्ञ,आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्री.दिपकजी करंजीकर.त्यांच्या या उद्बोधक व्याख्यानाचा सारांश-
“ २२ एप्रिल २०२५ च्या भ्याड ह्ल्ल्यामागची पार्श्वभूमी समजावून घ्यायची असेल तर आपल्याला १९७४ सालाकडे जावे लागेल. १९७१ ला बांगलादेशची निर्मिती झाली.१८ मे १९७४ रोजी आपण पोखरण अणूचाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांतर पाकिस्तानने वैज्ञानिक अब्दुल कादिर यांची नेतृत्वाखाली तथाकथित अणूचाचणी केली. पाकिस्तान खरच अण्वस्त्रधारी आहे की नाही? हीच मुळात शंका आहे, परंतू पाकिस्तानच्या मोक्याच्या भूराजकीय स्थानामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही राष्ट्रांसाठी तो महत्वाचा आहे. पाकिस्तान ताब्यात असेल तर अफगाणिस्तान आणि पूर्ण आशिया खंडावर लक्ष ठेवता येते. यामुळेच अमेरिकेने सतत पाकिस्तानची पाठराखण केली. पाकिस्तान हे अमेरिकेचे पाप आहे.फाळणीपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तानच्या संघर्षात अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी कायमच दुटप्पी भूमिका घेतली आहे. यामागे फक्त आणि फक्त स्वहित होते. या राष्ट्रांनी पाकिस्तानला आपल्या स्वार्थासाठी सर्वप्रकारे मदत केली आणि अजूनही करत आहेत. जे जे छोटे देश त्यांच्या या स्वहिताच्या आड आले,त्या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागले,मग ते बांगलादेश असो की श्रीलंका,नेपाळ,भूतान.
या डीप स्टेटनेच बांगलादेशात उठाव घडवला. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान चितगाव बंदर चीनला आणि सेंट पेट्रिक बंदर अमेरिकेला देत नव्हत्या म्हणूनच युसुफ यांना हाताशी धरून अमेरिकेने हा डाव आखला. ही सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. कारण पहलगाम हल्ला हा अशाच एका विकृत मानसिकतेतून झाला आहे. आपण असहायतेत जगू शकतो,अज्ञानात नाही.
पाकिस्तानात सध्या मोठे गृहयुद्ध चालू आहे. तो चार तुकड्यात विभागला जाऊ शकतो. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) पाक सैन्याच्या नाकी नऊ आणले आहेत. आतापर्यंत त्यांनी पाक सैन्यावर जवळपास ७१ हल्ले केले आहेत. शेकडो पाक रेंजर्स त्यात मारले गेले आहेत. त्यात पाकचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर हे अमेरिकेचे प्यादे आहेत. स्वत:च्या देशात खाण्यापिण्याचे हाल,सैनिकांची दुर्दशा अशी चोहोबाजूंनी कोंडी होत असतानाही पहलगाम हल्ला करण्याची आत्मघातकी योजना करण्याचा मूर्खपणा पाकिस्तानच करू शकतो.
याउलट भारतात गेल्या १० वर्षात अनेक सकारात्मक बदल झाले. एक प्रकारची अनुकुलता निर्माण झाली आहे. वक्फ कायदा रद्द होणे,३७० कलम हटवणे,राममंदीर उभारणी, ट्रिपल तलाक कायदा रद्द करणे अशा अनेक सामाजिक सुधारणांनी भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. सक्षम नेतृत्व, उत्तम आर्थिक बांधणी ह्या सा-यामुळे आज भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे.भारताच्या या अचाट कामगिरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोटशूळ उठला आहे. ह्यातून पाकिस्तान आणि काही पश्चिमी राष्ट्रे अस्वस्थ झाली आहेत.
खरतर काश्मीरचा प्रश्न आपल्या आतापर्यंतच्या सत्तर वर्षांच्या काळात अतिशय बेजबाबदारपणे हाताळला गेला. प्रचंड लष्करी क्षमता असतानाही आपण पाकव्याप्त काश्मीर घेऊ शकलो नाही. परंतू आताच्या सक्षम सरकारमुळे त्यावर मार्ग सापडत आहे. पहलगामवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर राजकीय दबाव तर आपण आणलाच परंतू सिंधू जलकरार रद्द करून आपण पाकिस्तानची भयंकर कोंडी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरचे जवळपास पंधरा दिवस लष्कराने,सरकारने जी काही जबरदस्त व्यूहरचना केली त्याला तोड नाही. ७ मे नंतरच्या भारताच्या ‘न भूतो न भविष्यती’ प्रतिसादानंतर पाकिस्तानच नाही तर जगभरातील अनेक शक्तीशाली राष्ट्रे आश्चर्यचकित झाली.
दिनांक ७ मेच्या रात्री पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना निकामी करत केलेली उत्तरीय कारवाई म्हणजे जगाने आतापर्यंत पाहिलेल्या टेक्नीकल युद्धाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. याआधी भारताने अशा अतिरेकी हल्ल्यांना केवळ बचावात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले परंतू उरी,बालाकोट आणि आता पहलगाम हल्ल्याचे उत्तर अत्यंत आक्रामक पण तितकेच नियोजनबद्ध पद्धतीने दिले गेले आहे. आपण जमीन,आकाश आणि पाणी या तीनही आघाड्यांवर पाकिस्तानला मात दिलीच परंतू सायबर युद्धातही आपण बाजी मारली. ज्यामुळे चीन,अमेरिका यांसारख्या राष्ट्रांची तंत्रज्ञानाची धुंदी आपण उतरवली आहे. ‘ S-400’ या संरक्षक प्रणालीत आपण ज्या काही सुधारणा केल्या आहेत त्याला तोड नाही.त्यामुळे अनेक राष्ट्रांचा या क्षेत्रातील दबदबा आपण क्षणात कमी केला.दिनांक १० मेच्या रात्री ब्राम्होस क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या ११ हवाईतळांवर केलेला अचूक हल्ला पाकिस्तानच्या अनेक वर्षे लक्षात राहणारा आहे. अतिरेकी तळापाठोपाठ या विघातक शक्तींना मदत करणा-या लष्करी तळांवर आपण हल्ले केले.पाकिस्तानच्या फतेह १ आणि २ या क्षेपणास्त्रांना हाणून पाडले. किराणा हिल्स वरील हल्ला हा या युद्धातील टर्निंग पोइंट ठरला. तिथून जवळच पाकिस्तानचे परमाणू साठे आहेत.भारत केवळ ७२ तासात पाकिस्तानच्या अणूसाठ्यापर्यंत पोहोचेल अशी पाक सरकार आणि अमेरिकेला सुतराम शक्यता वाटत नव्हती.पण ते घडले आणि सूत्रे पटापट फिरली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी.वेन्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला.
पाकिस्तानने शरणागती पत्करली,युद्धविरामाची याचना केली म्हणून भारताने युद्धविराम केला. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांपुढे घातलेले हे लोटांगण नाही तर स्वसामर्थ्यावर असलेला विश्वास आणि भविष्यातील परिणाम लक्षात घेऊन आपण युद्धविराम केला. हा युद्धविराम योग्यवेळी केला गेलेला आहे. त्याचा आपल्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.हा केवळ युद्धविराम आहे पण ऑपरेशन सिंदूर अजून चालूच आहे.आता आपण आपल्या पद्धतीने,आपल्या अटींवर आणि आपल्या संपूर्ण सामर्थ्याने उत्तर देऊ असा स्पष्ट संदेश पाकिस्तानसह सर्व देशांना योग्य पद्धतीने गेलेला आहे. युरोप,मध्य पुर्व आशिया,ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांनी आपल्याला पाठिंबा दिला.युद्ध चालू राहिले असते तर आपल्यालाही थोडेफार आर्थिक नुकसान झालेच असते.
या युद्धाचे काय परिणाम असतील? सर्वप्रथम भारताच्या लष्करी सज्जतेने अनेक देशांचे धाबे दणाणले आहे. भारताला अनेक आघाड्यांवर युद्धांचा प्रचंड अनुभव आहे. डोंगराळ भागात युद्ध करण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेतच परंतू जल,वायू,पृथ्वी या तिन्हीवर आपले प्रभुत्व आता सिद्ध झाले. खरतर देशांतर्गत अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत, अनेक ‘फितूर जयचंद’ आपल्या देशात आहेत,असे असताना सैन्यावर आणि भारतीय तंत्रज्ञानावर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या कसोटीवर शंभर टक्के खरे उतरलेले आपले सैन्यदल आणि तंत्रज्ञ यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. सगळ्यानी एक होऊन सैन्याच्या,सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे,आपल्या सैन्याचा अपमान होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी,हीच या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आणि देशाच्या वीर जवानांना आदराजंली ठरेल ”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक आणि
सीएमए हेमंत देशपांडे, सरकार्यवाह, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक उपस्थित होते. संस्थेच्या व्यासपीठावरून असे राष्ट्रप्रेरक विचार ऐकणे ही नाशिककरांसाठी भाग्याची बाब आहे. या व्याख्यानातून काय बोध घ्यायचा? श्रध्येय अटलजींच्या चार ओळीतून हा बोध घेऊया-
“बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा.
कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा”